तीन गझला : श्रीराम गिरी







१.

जरा थांबून केलेला पुकारा हा;
तुझ्या लक्षात आला का इशारा हा.

कशाला जीव वेड्या जाळतो इतका;
तुला जर जायचे सोडुन पसारा हा.

पुरे झाल्या अता लाटांवरी शंका;
तुला बोलावतो आहे किनारा हा.

कधी संतापतो मीही इथे मजवर;
पकडला मी कशाकरिता निखारा हा.

खरे कळले तुझ्यावर प्रेम 
जडल्यावर;
कसा असतो मनावरती पहारा हा.

२.

भावना एक अफवा आहे;
कोण मनाने हळवा आहे.

फुटले ओठांवर हसू तिच्या;
दिवा पेटला हिरवा आहे.

धार बघुन घे 'शेरा'ची तू;
शब्दांमध्ये बिचवा आहे.

प्रीत असे जन्मोजन्मीची;
युगायुगाचा रुसवा आहे.

त्या वाटेने जावे आधी; 
ज्या वाटेवर चकवा आहे.

कष्ट वगैरे काही नाही;
चिंतेचा हा थकवा आहे.

३.

शब्द साधा एवढा उच्चार नाही;
ऐक, कवितेसारखे हत्यार नाही.

खर्च केली पुस्तकांवर ह्या कमाई;
 फर्निचरने थाटले घरदार नाही.

झूठ आहे प्रेमबिम हे शपथ,वचने;
पण कुणी मानायला तय्यार नाही.

तू नको इतक्यात भाळी विजय गोंदू;
घेतली अद्याप मी माघार नाही.

हे कुणा कळले खरे दुखणे जगाचे;
हा कुणापाशी खरा उपचार नाही.

       


1 comment:

  1. तिनही गझल सुंदर👌
    बिचवा अप्रतीम💐💐

    ReplyDelete