१.
आयुष्याशी झगडत सारे जीवन सरले नाही हरले
वादळातही माझे मीपण जपून जगले नाही हरले
अट्टहास हा त्याचा होता काळोखाला रोज धाडले
नभात माझ्या तारांगण पण मीच रेखले,नाही हरले
बिकट वाट अन शूल त्यावरी असले सारे कावे केले,
तीच वाट मग तुडवत माझे पद सरावले,नाही हरले
नाही कुठला झेंडा हाती,नाही कुठला टिळा लावला
चालत चालत विवेकवाटा पथ मंतरले,नाही हरले
लाख झेलले प्रहार आणि लाख पराभव झाले गेले
फिनिक्सापरी रक्षेमधूनी पुन्हा जन्मले,नाही हरले
२.
हे गुपित मला जन्माचे आत्ताच उमगले बाई
शोकात बुडाले सगळे, बघुनी हिरमुसली दाई
सोसलीस अगणित दुःखे,सोसल्यास अगणित वेणा
पोसून मला तव उदरी का जन्म दिला गे आई ?
का उत्सुक मी ही व्हावे,जग कसले ते बघण्याला
चुकलेच वाटते आता,मी उगाच केली घाई .
ते म्हणती मजला अबला,झाले माझे रखवाले
मातेच्या ऋणातुनी का, झाले कोणी उतराई?
कसली शिक्षा समजेना,टाळावी तरी कशी मी?
कोणीही माझा नाही,व्यर्थ हा जन्म का जाई?
मी शोध स्वतःचा घेता,आठवे अहल्याबाई
फुंकून टाक रक्षा ती,अंगार असे तव ठाई.
मी सावित्री मी जिजाऊ, बुद्धी-बल माझ्यापाशी
दावेन जगाला माझ्या, कर्तृत्वाची नवलाई.