१.
फायद्याचे सांगणारे चार होते
हार होता बोलणारे फार होते
रोज भिडणारे कधी जर एक होता
तीन पक्षांचे उभे सरकार होते
पाहुनी अपघात जर तू दूर गेला
माणसा माणूसकी मग ठार होते
वाट काट्यांची सुखाने पार केली
चालणारे सोबती दमदार होते
शान वाढवते सदा दोन्ही घरांची
लेक लोकांना तरीही भार होते
२.
हवे तसे ते करून गेले
मला शेवटी छळून गेले
कामापुरता मामा असतो
पुरते मजला कळून गेले
रस्त्यावर अपघात जाहला
शंभर डोळे बघून गेले
धैर्याने सामोरे गेलो
संकट माझे टळून गेले
मागे कायम बडबड त्यांची
समोर जाता पळून गेले
शिक्षण झाल्यावरती कळले
मायबाप तर थकून गेले
सोन्यावाणी शेत पिकवले
दुष्काळाने जळून गेले
पसंत नव्हता तिला तरीही
लग्न शेवटी ठरून गेले
छंद आपला जपला ज्यांनी
खरे तेच तर जगून गेले
....................................
प्रसन्नकुमार धुमाळ
मु.पो आलेगाव,ता.दौंड, जि. पुणे
Mobile No.8830801103
What's App.7875878866